Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Friday, January 26, 2024

सातारा - पश्चिम घाटाला पडतोय प्लास्टिकचा विळखा.


सातारा - पश्चिम घाटाला पडतोय प्लास्टिकचा विळखा.

रांगडा निसर्ग, आल्हादायक वातावरण व चांगले रस्ते यामुळे शहरातील लोकांचा या ठिकाणी सतत वावर असतो. त्यात भरीस भर कास पुष्प पठाराला युनेस्को ने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केल्यानंतर इकडे येणाऱ्या लोंढ्यांमध्ये अजूनच भर पडली. भरीस भर अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर,वासोटा, बामणोली आणि वज्राई धबधबा आहेच पाहण्यासाठी. 

वाढत्या (मॅरेथॉन, क्रिकेट) स्पर्धांचे आयोजनं, प्री वेडिंग शूट, अनियोजित वाढतं नागरिकीकरण आणि जोडीने वाढणारा पर्यटकांचा वावर यामुळे हि सर्व ठिकाण हल्ली गर्दीने गजबजलेली असतात. हि गर्दी येताना ना-ना तर्हेच्या गोष्टी आपल्या सोयीसाठी घेऊन येते आणि जाताना वडिलांची वतनदारी असल्याप्रमाणे घाणीचं साम्राज्य मागे सोडून जाते. नियोजित कार्यभाग साधुन  सोशल मीडिया वर फोटो किंवा रील्स टाकून झाल्या कि, ना आयोजकांना त्या निसर्गाचा सोयर-सुतक असतं ना त्यातील सहभागी स्पर्धकांना.

त्यातच हल्ली "भावा लाईफ मध्ये फक्त एन्जॉय करायचा संघटना" जबरदस्त ऍक्टिव्ह आहे यांना महागाई दर, बेरोजगारी, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी असले काही बाही कळत नाही, मुळात त्यांच्या लेखी असे काही प्रॉब्लेम असतात याची जाणीवही नसते. तर हि होतकरू संघटना पार्ट्या करण्यासाठी नेहमी नव-नवीन निसर्गरम्य जागांच्या शोधात असते. यांची खासियत म्हणजे मजा करायला जिथे बसणार तिथेच घाण करनार, तिथेच दारूच्या बाटल्या फोडणार, सिगारेट ओढून झाली की उरलेल्या काड्यांनी रानात वणवा लावणार. गुटखा मावा खाऊन झाला कि पाकीट तिथेच फेकणार. ह्या अशा मस्करीत लावलेल्या वणव्यांमुळे पुर्ण इको सिस्टीम दणाणते, पिकांचं नुकसान होतं, सरपटणारे जीव-जंतु, पशुपक्षी  घरासकट जळुन मरतात. मोठं मोठ्ठाली झाडं मुळासकट जळुन खाक होतात. ज्याचा परिणाम स्थानिक ग्रामस्थांवर ज्यांनी आयुष्यभर मेहनत घेऊन हा रानमेवा जपलेला असतो आणि अर्थात निसर्ग चक्रावर होतो. 

कारण "Every Action Has Opposite Reaction! 

बाबांनो तुम्ही दारू प्यावी कि नाही गुटखा, तंबाखू, सिगारेटच व्यसन करावं की नाही याची चेतावणी त्या वस्तूंवर विक्रेत्यांनी दिलेली असते त्यात व्यसन करणे चांगले कि वाईट हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा. घटनेने प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य बहाल केलंय पण मित्रांनो उघड्यावर घाण पसरवण्याच स्वातंत्र्य तुम्हाला कोणी दिल? मी असे कित्येक पांढरपेशे पाहिलेत जे चालत्या गाडीतुन खाऊन-पिऊन झालं कि रॅपर अथवा बॉटल खिडकीतून चुरगाळून बाहेर फेकून देतात आणि नंतर हेच महाभाग एसी मध्ये बसून ग्लोबल वॉर्मिंग,ओझोनला किती मोठठं भोक पडलंय आणि अंटार्टिका वरचा बर्फ कसा आणि किती वितळतोय यावर सो कॉल्ड चर्चा करनार बघा किती विरोधाभास आहे ते?.  

तसं प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर प्लास्टिकचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात नाकारू शकत नाही, मी स्वतः भरपूर साऱ्या गोष्टी प्लॅस्टीच्या वापरतो. पण प्रत्येकाने घरात पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं जर टाळलं व रोजच्या वापरात एखादी कापडी पिशवी घरच्याच जुन्या कपड्यांपासून शिवून घेतली तर छोटा का होईना फरक पडेल. रॅपर, बाटल्या वेष्टने इकडे तिकडे न फेकता गावा जवळच्या कचरा कुंडीत अथवा निर्माल्य कलशात टाकलीत तर निदान ती पुनर्वापर प्रक्रिया करणाऱ्या प्लांट पर्यंत पोहचू शकतील. 

कित्येकजण कर्मकांडात एवढे अडकलेत कि निर्माल्य कचरा प्लास्टिक पिशवी सकट नदीत अथवा समुद्रात फेकून देतात. अरे बाबांनो हार-फूले हा ऑरगॅनिक कचरा आहे तो घरच्या कुंडीत टाकला तर त्याच छान खत तयार होतं. आणि पाण्यातच टाकायचंय तर पिशवी काढुन टाका ज्याने करून जलाशयातले जीव तो खाऊन त्याच विघटन तरी करतील. गणपती विसर्जनात तर मी मूर्ती सकट संपूर्ण डेकोरेशन नदीत फेकून देताना पाहिलंय. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. तरी नशीब आता थर्माकॉल वर बंदी लावलीये. 

गेला बाजार आमच्या सारखे पर्यावरण प्रेमी मधून मधून बेडकासारखे डराव डराव करून येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देतात पण "नगाऱ्याची घाई तिचे टिमकीचं काय?" या म्हणी प्रमाणे सर्व विषय पुन्हा बासनात गुंडाळावे लागतात.  

"वर नमूद केल्या प्रमाणे फेकून दिलेल्या घाणीत मुख्यत्वे प्लास्टिकचे साम्राज्य सर्वत्र पसरलेलं दिसतं. त्यात जास्त करून वापरलेल्या देशी- विदेशी दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स, गुटखा आणि खाद्य पदार्थांची वेष्टने यांचा खच सर्रास पडलेला दिसतो. आज कित्येक जंगली प्राणी आणि जलचर अजाणतेपणे प्लास्टिक त्यांच्या पोटात गेल्यामुळे अथवा एखाद्या अवयवात अडकल्यामुळे दगावत आहेत."

नुसतं समर्थ मंदिर पासून कास तलावा पर्यंत किंवा कुर्णेश्वर बोगद्या पासून ठोसेघर धबधब्या पर्यंत रस्त्याने प्लास्टिक गोळा करत गेलात तर एक आठवडा कमी पडेल आणि निदान टनभर तरी प्लास्टिक आरामात गोळा होईल.

 हल्ली गुगल वर सर्रास  विचारला जाणार प्रश्न "प्लास्टिक पृथ्वीवर विरघळते का? तर त्याच उत्तर पुढीलप्रमाणे "त्यातील केवळ 9% कचरा पुनर्वापर केला जातो आणि 12% जाळला जातो. उर्वरित 79% लँडफिल किंवा वातावरणात कायमचा एका किंवा दुसर्या स्वरूपात तसाच राहतो कारण त्याचं विघटन होतं नाही.." 

हे सर्व होण्यामागची मुख्य कारणं "जनजागृतीचा अभाव, प्लास्टिक पुनर्वापराची अपुरी प्रक्रिया आणि स्थानिक प्रशासनाची उदासीनता. अश्या ढोबळ मुद्द्यांमुळे हा प्रश्न सद्या ऐरणीवर आला आहे. आणि ही कचरा वाढ अशीच चालू राहिली तर हा जागतिक वारसा इतिहास जमा झाल्यावाचून राहणार नाही.  

मी या लेखाच्या माध्यमातुन समस्त पठार बांधवाना साद घालतो की जमेल तसं जमेल त्या प्रमाणे हा निसर्ग जपण्याचा प्रयत्न करा. आज परमेश्वराच्या कृपेने आपल्याला सुंदर अश्या ठिकाणी जन्मभूमी मिळाली आहे. येणाऱ्या काळात माथेरान-महाबळेश्वर प्रमाणे आपल्या भागात पर्यटन व्यवसाय भरपूर वाढणार आहे रोजगाराच्या नव-नवीन संधी उपलब्ध होतील. त्यामुळे आपण या सर्व गोष्टींवर एकत्रित पणे वेसण घालू शकलो तर आपल्या मुलांना घरापासून दुर पुण्या मुंबईला प्रदूषित वातावरणात कर्ज काढुन घर घेऊन धकाधकीचं आजारी आयुष्य जगावं लागणार नाही. बाकी ह्या लेखातून मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. चुक भूल माफी असावी.  


                   "आज निसर्गाला वाचवाल तर उद्या निसर्ग तुम्हाला वाचवेल."


Sunday, June 4, 2017

मि. अँड मिसेस पाटील - धरनीकंप



वारः सोमवार, वेळः पहाटे ६ वाजता.
मी गाढ झोपेत असतानाच धान्न..धान्न..धान्न्न... अचानक जमीनीला हादरे बसायला सुरवात झाली. माझ्या मेंदुला काही कळायच्या आतच मी शेजारीच झोपलेल्या माझ्या साडेतीन वर्षाच्या छकुलीला कवटाळलं आणि शेजारच्या टेबलखाली जाऊन बसलो. बहुतेक भुकंप झाला होता. मला चटकन भुकंप झाल्यावर कसा वाचवाल जीव? या वायझेड चॅनलवरच्या कार्यक्रमाची आठवन झाली. मी लेकीला छातीशी कवटाळल आणि दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत घेऊन भिंतीला टेकुन बसलो. अचानक झालेल्या प्रकारामुळे मुलगी पार गांगरुन गेली होती. तिच्या एकंदर चेहयावरचे भाव "ए पप्पाड्या तुला काही कळत की नाही?" असे सांगत होते. काही वेळातच हादर्यांचा आवाज बंद झाला. इतक्यात माझी लेक मला ढोमसत म्हणाली "ए पप्पा मला सोडनां मला मम्माकडे जायचय". "अरेरे मला एका क्षणात माझ्या अर्धांगिणीची जाणीव झाली. कुठे आहे ती? तिला पाहायला टेबला बाहेर आलो. पोरगी एव्हाना मला हिसके देऊन हॉल मध्ये पळाली होती.  



मी हॉलच्या दिशेने निघालो तसा परत धान्न धान्न...धान्न्न्न.....आवाज सुरु झाला. पाहतो तर काय आमच्या सौ रश्शीवरच्या उड्या मारण्यात गुंगल्या होत्या. आमच पासष्ठ किलोच धुड लीलया खालीवर जाताना पाहुन मगाशच्या हादर्यांचा उलगडा मला झाला. 

सौ नी ग्रे कलरचा लेगीन्स आणि वर पिंक कलरचा टी शर्ट घातला होता. केस एकत्र मागे ओढुन पोनी टेल घातली होती. एकंदर प्रेगन्सी नंतर वाढलेल्या वजनामुळे ती फीट कमी आणि फॅटच जास्त वाटत होती. मी न राहावुन बोलला काय गं आज सुर्य पश्चिमेला कसा? नाही म्हटल गेली दोन वर्ष ओरडत होतो. "व्यायाम कर "व्यायाम कर! पण तु जागची हलली नाहीस उलट मलाच बोलायचीस आधी स्वतःच पोट बघा, तुम्ही आता बदलात, तुमचं माझ्यावर प्रेमच राहील नाही, ऑफिसात फिगर वाल्या पोरी बघता आणि घरी येऊन मला ऐकवता. भेटली असेल कोणीतरी सटवी चवळीच्या शेंगेसारखी...नुस्ती च्यावच्याव...नाही म्हटल जे करतेस ते स्वागतार्हच आहे. पण अचानक हा बदल कसा काय झाला?

अहो काही नाही मला माझी चुक लक्षात आली. तुम्ही बिचारे सतत माझ्या मागे लागायचात पण मीच तुम्हाला काहीही बोलायचे. पण नाही, "मला आता व्यायामाच महत्व कळु लागलय". (एका दिवसात मी मनातल्या मनात) मला सौ बंदुकीच्या गोळ्या मधात बुडवुन डागतायत अस वाटु लागलं. चेहरा काहीसा हसरा करतच मी म्हणालो चला बर झालं देर आये दुरुस्त आये. ते सोडा हे पहा माझे नवीन शुज, (दोन्ही पाय जवळ करुन हात कटीवर ठेऊन फक्त डोळे शुजवर..एकदम रुक्मीनी अवतार) पुमाचे आहेत आणि ही बॅग नाईकेची. आणि हो आज दुपार पासुन मी चळवळकरांच्या स्पेशल वेट लॉस बॅचला जाणार आहे. तेही अन्युल सब्सक्रिप्शन मी केलय परवाच्या शनिवारी. अरे व्वा करत मी मनातल्या मनात या बाईने क्रेडीट कार्डला कितीचा घोडा लावला ह्याचे हिशेब करु लागलो.

बर मी आंघोळ करुन यतो, माझा टिफिन तर रेडी आहे ना? अहो म्हणजे काय, "हो पण आता नेहमीसारख तेलकट तुपकट आणि चमचमीत खायला मिळणार नाही, आमच्या सरांनी आम्हाला डाएट चार्ट दिलाय तोच आता घरात फॉलो होणार. आईच्यान हा सर म्हणजे नक्कीच कोणी तरी दिव्यात्मा असला पाहीजे. ज्या बायका उभ्या आयुष्यात आपल्या नवर्याच ऐकत नाहीत त्या एका दिवसात या सरांच ऐकायला लागतात. मला तर त्याच्याकडुन एखादा तावीज वैगरे मिळतो का ते पहाव अस वाटु लागल.
चला आता माझा वेळ खाऊ नका, तुमचा टीफिन आणि बॅग भरुन ठेवली आहे. आंघोळ करुन किचन मध्ये ठेवलेले ओटस खाऊन घ्या. माझे अजुन तीन सेटस बाकी आहेत. धान्न् धान्न..धान्न...परत रश्शी गिरणीच्या पट्याप्रमाणे फिरु लागली. मला उगाचच खालच्या मजल्यावरुन कोणीतरी शिव्या देतय असा भास होऊ लागला. तर माझी कन्या तिच्या बाजुला उभी राहुन कमॉन मम्मी करत जागच्या जागी उड्या मारु लागली. काहीही असो नेहमीच गाऊन मध्ये दिसनार आमच ध्यान आज जिमच्या पेहरावात एकदम हॉट दिसत होत. मला बॅक ग्राऊंडला "हळद आणि चंदनाचे गुण समावे संतुर त्वचा आणखीन उजळे संतुर..संतुर. हे गाण लागल्याचा फील आला. मी खांद्यावर टॉवेल घेऊन बाथरुम मध्ये निघुन गेलो.

Wednesday, October 21, 2015

दाभोळकरांची हत्या?.........



२० ऑगष्ट २०१३ हा दिवस यापुढे इतिहासात नक्कीच काळा दिवस म्हणुन ओळखला जाईल. कारण याच दिवशी दाभोळकरांची अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या घालुन हत्या केली. समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरांविरुद्ध लढणारा अजुन एक आवाज बेमालुमपणे शांत करण्यात आला आणि त्यानंतर लगेचच पुढील घडामोडींना ऊत यायला लागला. सर्वात प्रथम सरकार खडबडुन जागे झालं आ्णि जादु टोणा विरोधी बिल संसदेत पास करुन धेण्यासाठी गडबड सुरु झाली. खुणाच्या आरोपांवरुन वेगवेगळ्या धर्मसंस्थावर आरोप प्रत्यारोप व्ह्ययला लागले.निरनिराळ्या ठिकाणी आंदोलणे, मुक मोर्चे आणि काळ्या फिती लावुन निषेध व्यक्त केला गेला.राष्टीय-आंतराष्टीय वाहिण्यांवरही या बातमीचा व्यवस्थित प्रसार केला गेला. फेसबुक, ट्विटरवर तरुनाईचे ज्वलंत स्टेस्टस अपलोड होऊ लागले. व्रुत्तपत्रांमधील एक कॉलम फक्त याच बातमी साठी आरक्षित होऊ लागला.प्रत्येकजण  डॉक्टरांचे कार्य कसे मानवतावादी होते आणि डॉक्टर आयुष्यभर या कार्यासाठी किती पोटतिडकीने झटले हे आपआपल्यापरीने मांडु लागला.आता हे सर्व घडत असताना आपले लिंबु टिंबु राजकीय पक्ष तरी का मागे रहावेत? तेही मग डॉक्टरांच्या मारेकरयांना शिक्षा झालीच पाहीजे अशा आरोळ्या ठोकत आपआपल्या पोळ्या भाजु लागले.पण या सर्वांचा फायदा काय? “बैल गेला आणि झोपा केला” अशी एक प्रचलीत म्हण आहे. आज हा सर्व गदारोळ माजण्यासाठी खरचं डॉक्टरांच जाणं गरजेच होतं का?
मुळात भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातच हे ठळक शब्दात नमुद केलेलं आहे की.
”आम्ही भारतीय जनता, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक (लोकशाही) गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय (सामाजिक, आर्थिक आणि राजकीय), स्वातंत्र्य (विचार, उच्चार, श्रध्दा, धर्म आणि उपासना), समता (दर्जा आणि संधीबाबत), बंधुता (व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता राखणारी) यांची शाश्वती देण्याचे विचारपुर्वक ठरवीत आहोत. आणि हि घटना आमच्यासाठी तयार मान्य स्वीक्रुत करीत आहोत”.

 म्हणजेच आपल्या राष्ट्रात धर्म ही व्यक्तीची खाजगी वा एच्छिक बाब असुन प्रत्येकाला स्वेच्छेनुसार कोणत्याही धर्माचा अवलंब करता येईल. मात्र सार्वजनिक बाबतीत धर्माची ढवळाढवळ खपवुन घेतली जाणार नाही.
परंतु खेदाची बाब ही आहे की एवढ सर्व असुनही रोज सकाळी व्रुत्तपत्र उघडल अथवा एखादी व्रुत्तवाहीनी लावली तर पुढील बातम्या वाचायला अथवा पाहायला मिळतात.
१)   अमुक एका गावात गुप्तधनासाठी चिमुरड्याचा बळी.
२)   रोग बरा करतो सांगुन मांत्रिकानेच केला विवाहीतेवर बलात्कार.
३)   परम पुज्य बाबांवर त्यांच्याच आश्रमातील महीलांचा लैंगिक शोषणाचा आरोप.
४)   रक्कम दुप्पट करुन दाखवतो म्हणुन घेतलेली मुद्दल घेऊन बाबा पसार.
५)   अमुक एका मंदीरातील मुर्तीची अद्न्यात व्यक्तींकडुन विटंबणा.
६)   कुंभमेळ्यात/ तीर्थयात्रेला गेलेल्या भावीकांचा चेंगराचेंगरीत म्रुत्यु.
७)   अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवाद्यांचा आतंकवादी हल्ला.
८)   आणि हल्लीच केदारेश्वर येथे ढगफुटी व जमीन खचल्यामुळे हजारो भाविक ठार.

अशा उदाहरणादाखल देण्यालायक अनेक बातम्या आहेत. तरीही प्रत्येक बाबतीत ठिकाण आणि देव वेगळा असला तरी मरणारा अथवा फसणारा भाविकच असतो याच कारण नक्की काय?
आज प्रत्येकालाच झटपट श्रीमंत व्ह्यायचय, नाव कमवायचय, प्रसिध्दिच्या झोतातं यायचयं आणि यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी त्यांच्यात आहे.आणि याच मोहापायी लोक नाना तर्हेच्या अंधश्रध्देला बळी जातात.आणि याचाच फायदा समाजातील काही धुर्त लोक हेतुपरस्पर घेऊन स्वतःच उखळ पांढर करतात. आज आपली अर्थ व्यवस्था एका वेगळ्याच टप्यातुन जात आहे.रुपयाचा भावं तर  ई.सी.जी. सारखा वळवळत आहे जीवनोपयोगी वस्तुंचे भाव गगणाला भिडत असताना  या स्वघोषित बाबा बुवांचा आणि त्यांनी चालवलेल्या तीर्थक्षेत्रांचा धंदा मात्र तेजीत आहे.कारण आजही ठरलेल्या वाराला त्या त्या ठिकाणी (तीर्थक्षेत्र) तेवढीच गर्दी होते. बहुतांशी ही गर्दी दिवसेंगनिक वाढतच जात आहे. कारण काय तर तो देव नवसाला पावतो किंवा तिथल्या बाबांच्या अथवा माताजींच्या हाताने गुण येतो.एरव्ही भाज्यांचे भाव वाढले म्हणुन रडणारा सामान्य माणुस बिशी किंवा फंडातले पैसे तोडुन सहकुटंब सहपरिवार दर्शनासाठी येतो आणि त्याच्याच मेहनीतीचा, घामाचा पैसा तिथल्या दान पेट्यांमध्ये टाकतो का तर म्हणे पुण्य मिळते. आपण नेहमी एकतो अमुक देवाला अज्ञात इसमाकडुन तमुक किलोचा रत्नजडीत हार अर्पण.मग मुळात प्रश्न हा आहे की हा इसम जर किलो किलोने देवाला देवु शकतो तर वास्तविक त्याच्याजवळ किती संपत्ती असली पाहीजे. आणि मुळात त्याने ती कशी मिळवली म्हणजे नैतिकतेला धरुन की सामाजिक नितीमुल्यांचं अवमापण करुण आणि तरीही देव त्यालाच पावतो? आणि इथे बिचारा आमचा शेतकरी वर्षभर इमाने इतबारे घाम गाळतो तरीही वर्षाअखेर त्याच्या डोळ्यात पाणी आणि गळ्यात फासं मग हा भेदभाव का?
आजकाल आपण पाहतो नियम धाब्यावर बसवुन ठिक ठिकाणी देवांची मंदीरे बांधली जातात मग त्यांनाच प्रति शिर्डी, प्रति बालाजी तर अगदी प्रति काशी अशी मोठाली नावे दिली जातात. (आपलं नशीब बलवत्तर अजुन ह्यांनी प्रतिस्रुष्टी निर्माण करायचा बेत नाही आखलाय) मग पुन्हा खेळ सुरु होतो पैशांचा आणि अंधश्रध्देचा. एखादा स्वयंघोषीत बाबा अथवा माताजी तिथली सी.ई.ओ होते. मग थोडेसे जादुचे प्रयोग दाखवले जातात. मग ब्रेन वॉशींग करुन अनुयायांची भरती केली जाते आणि हे सर्व सोपस्कार पार पाडले की आमचाच परमार्थ कसा श्रेष्ठ आणि आमचेच बाबा/माताजी कसे ईश्वराचे अवतार आहेत याच्यावरुन आपआपसात कुरघोड्या चालु होतात. बोले तो चाय से ज्यादा किटली गरम.
कधी कधी वाटत आपल्या अर्थव्यवस्थेला परकीय चलणापेक्षा या अंधश्रध्देच्या दानपेट्यांचीच जास्त भीती आहे.

आज कित्येक लोकांच्या पाकीटात तुम्हाला त्यांच्या आई-वडीलांचा फोटो मिळणार नाही पण या भोंदु आई बाबांचा नक्कीच मिळेल. मग यांच्याच अनुयायांपैकी कुणी गाडी अथवा घर घेतलं तर गाडीच्या डॅशबोर्डवर अथवा घराच्या दरवाजावर देवाचा छोटासाच फोटो असतो.तर गाडीची मागची काच आणि घराच्या किचन पासुन बेडरुम पर्यंत सर्व या बाबा बुवांनी व्यापलेलं असतं
आजही खुलेआम व्रुत्तपत्रांमध्ये , ट्रेनमध्ये, बॅनरवर, सार्वजनिक जागांवर ,दुरसंचावर या बाबाबुवांची बिनधास्त जाहीरातबाजी सुरु असते. अजुनही कित्येक गावांमध्ये आजारी पडल्यावर लोक डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा भगत अथवा भक्तीनीकडेच जाणे पसंद करतात.

 याच मुळ कारण हे आहे की त्या भगत अथवा भक्तीनीला त्या माणसांच्या अज्ञानाचे असलेलं पुरेपुर ज्ञान.
 
आता तुम्ही म्हणाल हे सर्व फक्त खेड्यापाड्यात चालतं शहरांत हे सर्व शक्य नाही आहे तर हा तुमचा सर्वतः चुकीचा विचार आहे.आजही कित्येक चाळ सद्रुश्य झोपडपट्यांमधुन नवरात्रीत वैगरे देव्यांचा मांड भरला जातो एकाच वेळी दहा ते बारा स्त्रिया उठतात आणि संबळाच्या तालावर नाचु लागतात. सर्वांच्याच अंगात देवी आलेली असते.खरच देवं अंगात येतो? मग अस असुनही आजही समाजात एवढ्या वाईट घटना कश्या घडु शकतात?
आजही तुम्ही परेल जवळ्च्या के.ई.एम अथवा वाडीया हॉस्पीटल जवळुन गेलात तर तेथील तिकाटण्यावर (जिथे तिन रस्ते एकत्र येतात) तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उतारे काढुन ठेवलेले दिसतील. त्या उतार्‍यामुळे ठेवलेल्याच काही चांगल होवो अथवा न होवो कुत्रे मांजरी आणि घुशी मात्र गुटगुटीत होतात.
मुळात मी स्वतः देव अथवा भुत पाहीलेलं नाहीये तरीही या गोष्टींवर माझा विश्वास आहे.कारण माझा जन्म एका सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबात झाला असुन माझ्या शिक्षणाची सुरवातच मुळी पाटीवर श्री गणेशाय नमः आणि सरस्वती काढुन झाली. म्हणुन मी स्वताला कधीच नास्तीक म्हणणार नाही.आणि ईश्वराच अस्तित्वही नाकारणार नाही.आजही गावच्या कुलदैवताचे नाव घेतले की मुखात आपोआप चांगभल येतं कारंण ते घेतल्यानंतर मनाला एक नवी उभारी मिळते. नवा उत्साह संचारतो यालाच मी माझी श्रध्दा म्हणेन. परंतु मी जर अभ्यासच केला नाही. मेहनत न करता फक्त घरात बसुन त्याच देवाच नामस्मरण करत राहीलो आणि सर्व मला आयत विनासायास आणि काही खटपट न करता मिळावं अशी अपेक्षा केली तर तीच माझी अंधश्रध्दा आहे. 

माझ्यासाठी माझे आई-वडील , माझे गुरुजण, आणि ज्यांनी ज्यांनी मी या राष्ट्राचा एक जबाबदार नागरीक व्हावा म्हणुन प्रयत्न केले आणि मला माझ्या सामाजिक निती मुल्यांची जाणीव करुन दिली ते माझ्यासाठी देव आहेत.याऊलट ज्यांनी माझ्या या समाज्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन सामाजिक नितीमुल्यांच अधःपतन करु पाहीले ते माझ्यासाठी भुत/दानव आहेत.
आपल्या सभोवतालचा परिसर, पंचमहाभुतं (प्रुथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश) हे माझ्यासाठी देव आहेत कारण त्यांनी मला जीवणोपयोगी संसाधने आणि उर्जा स्रोते वेळोवेळी उपलब्ध करुन दिली.पण ज्या द्रुष्ट प्रव्रुती त्यांच्या मतलबी स्वार्थासाठी याचं नैसर्गिक साधन संपत्तीचा विनाश करत आहेत त्या माझ्यासाठी भुत/दानव आहेत.

आपण जर आपलं संत वाडंमय पाहीलं तर आपल्या लक्षात येईल ज्ञानेश्वरांपासुन रामदासांपर्यंत सर्वांनी देव चराचरात (सजीव-निर्जीव) शोधलाय पण आपण मात्र त्यांच्या कार्याला चमत्कारांच आंदण देऊन त्यांनाच देव करुन बसलो.

आता तुम्ही म्हणाल की हे समाजातील फक्त एका विशेष वर्गा पुर्ती मर्यादित आहे तर तुम्ही चुकीचा विचार करताय. आज कित्येक सुशिक्षित तरुणांची अवस्था बोट दहा आणि अंगठ्या वीस अशी आहे त्यांना पाहील्यावर हा सामान्य माणुस आहे की जादुगार हेच कळत नाही. 

आजकाल शहरांमध्ये कॉर्पोरेट बाबा आणि आईंची नवीन जमात उदयास आली आहे. ज्यांच मासिक उत्पन्नच एखाद्दा निष्णात एम. डी डॉक्टरपेक्षा जास्त असांव. आणि याच स्वयंघोषित बाबा आणि मातांजीच्या घरी आपली सो कॉल्ड पेज थ्री वरची स्वताला मॉर्डन समजणारी मंडळी पाणी भरत असतात त्यात कित्येक बड्या असामी या थेट सिने, क्रिडा, उद्योग अथवा राजकीय क्षेत्राशी संबधित असतात. आणि हे ढोंगी बाबाजी अथवा माताजी त्यांचं असंकाही ब्रेन वॉश करतात की त्यांना विचारल्याशिवाय यांच पान सुध्दा हलत नाही. मग याच बाबा बुवांविरुध्द डॉक्टरांसारखा एखादा समाजवादी मानवतावादी विचारवंत जेव्हा आवाज उठवतो तेव्हा तो सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न बनतो. आणि मग शिजु लागते कटाची खिचडी एका बाजुने डॉक्टरांच नाणं कस खणखणीत आहे म्हणुन प्रोत्साहन द्यायच तर पडद्यामागुन हाच आवाज कायमचा कसा बंद होईल या द्रुष्टीने सोंगट्या हलवायच्या यामुळेच आज कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. कदाचित उद्या राजकीय दबाव आणुन डॉक्टरांचे मारेकरी पकडलेही जातील. पण प्रश्न हा आहे की जे मारेकरी समोर असतील तेच डॉक्टरांचे खरे मारेकरी असतील की खरा सुत्रधार कुणी वेगळाच आहे?............................................!



Thursday, January 13, 2011

मि. & मिसेस. पाटील

घरी येताच जरा वैतागतच बुट काढले. "या रोजच्या प्रवासाचा पार वीट आलाय.." मी स्वतःशीच पुटपुटलो. इतक्यात आमच्या सौ. बाहेर आल्या; त्याही सोज्वळ हसत. मला पुढे काय काय वाढुन ठेवलं असेल याच्या निरनिराळ्या शंका- कुशंका मनात येऊ लागल्या. इतक्यात तिने स्वतःच माझी बॅग घेतली. "बसा हा, थकला असाल तुम्ही? मी आत्ता चहा टाकते तुमच्यासाठी, मग बघा कस ताज-तवानं वाटेल ते." काहीस आश्चर्यचकीत होऊन मी मागे दरवाज्याकडे वळुन पाहील की हे नक्की आपलच घर आहे ना? खात्रीसाठी नेमप्लेट ही परत पाहिली, तीही बरोबर होती. मग स्वतालाच एक चिमटा घेतला कळ अगदी डोक्यात गेली आयला म्हणजे हे स्वप्न सुद्धा नाही. मग नियतीने काहीतरी भयानक डावं आपल्याबरोबर खेळायच ठरवलेले दिसतयं. कारण लग्न झाल्यानंतर पहिले सहा महीनेच काय ते सुख मी अनुभवल होतं, त्यानंतर अहो चा मनोहर आणि मनोहर चा मन्या केव्हा झाला हे कळलच नाही. इतक्यात सौ बाहेर आल्या (हातात चहाचा पेला). मी कोचावर रेलुन बसलो होतो; ती आल्या आल्या मी सावुरन बसलो (ओरडा खाण्याच्या तयारीत.. बोले तो गांधीगिरी इश्टाईई.ल) पण कसलाच कांगावा नाही?
नाहीतर एरवी "तुम्हाला शिस्तच नाही, कपडे-मोजे कसेही फेकता, हात पाय धुवायचे नाहीत आल की पडायच लोळत, जरा पोटाकडे पाहीलय का? फक्त सोंड लावायची बाकी, टी व्ही आणि लॅपटॉप ह्याच्याशिवाय घरात देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणलेली एक जिवंत बायको सुद्धा आहे." (पण हीला समजवणार कोन? ह्या दोन्ही गोष्टी माझ्या बोटांवर चालतात कंटाळा आला की चॅनेल बदली किंवा बंद तरी करता येतं पण मी मात्र हीच्या बोटांवर नाचतो त्याचं कायं) असच काही बाही ऐकल्याशिवाय रात्रीच जेवण घश्याखाली उतरायच नाही.

मला संशय आला मी नकळत समोरच्या आरश्यात पाहील, क्षणभर मला कसायाकडील बोकडाची आठवण झाली. त्याला ही असाच कापायच्या आदी कुरवाळतात, पाणी पाजतात. नक्कीच काहीतरी घ्यायच वैगरे असेल किंवा कुठेतरी जाण्याचा बेत असणार. गेल्या वेळचा दाहक अनुभव मी अजुन विसरलो नव्हतो, जेव्हा हिच्या मैत्रिणीने चार तोळ्याचा सोन्याचा हार केला होता, तेव्हाही ही अशीच लाडात आली होती. मी तिला समजवलही (म्हणजे प्रयत्न केला) "अग तोळे हा शब्द बोलायला सोपा आहे, तो काही पतंगाचा मांजा नाही कि गेलो आणि आणला पाच-सहा तोळे फिरकी भरुन." मी आपली सहज फिरकी घेतली, पण ह्याच्यावरुन चौथे महायुद्ध आमच्या घरात पेटले. फरक इतकाच की त्याचा उल्लेख इतिहासात नाहीये. (हे वेगळ सांगायला नको की तो हार मला हार मानुनच घ्यावा लागला वर पेनल्टी एक तोळा)

तिच्या हातातला चहा घेत मी सहजच विचारलं सर्व ठिकठाक आहे ना? यावर तीने सरळ विषयालाच हात घातला, "अहो माझ्या आईच्या बाजुला नाही का ती लाडांची रुम होती, त्यांच्या मुलीची उद्या हळद आणि परवा लग्न आहे. माझ्यापेक्षा चार एक वर्षांनी लहान आहे. पण मी तिकडे (आईकडे) असताना ताई ताई करत नुसती माझ्या मागे असायची. तर मी काय म्हणते उद्दा सकाळीच मी....." तिचं बोलणे मध्येच तोडत मी सुरु झालो, "अग का नाही? शेजारी असले तरी शुभ कार्यात उपस्थित राहुन त्यांना हवी ती मदत केलीच पाहीजे. तू म्हणत असशीत तर मी आत्ता तुला गाडीवर सोडुन येतो. माझ्या जेवणा खाण्याची अजिबात काळजी करु नकोस. पण हे तीन दिवस मी तुझ्याशिवाय कसा काढणार?" (मला फारच वाईट वाटतय) असा चेहरा करुन सारं एका दमात मी बोललो.

"ए, एक मिनिट जरा श्वास घे माणसा... पहिली गोष्ट मी कुठेच चालली नाहीये आणि तुला अस एकट्याला सोडुन तर नाहीच नाही. गेल्यावेळी अशीच एकदा गेले होते दोन दिवसांसाठी तर तू आणि तुझ्या मित्रांनी साऱ्या घराचा उकीरडा करुन ठेवला होता. नुसत्या पलंगाखालुनच आठ-दहा दारुच्या बाटल्या मिळाल्या होत्या, आणि त्याही वर कळस, कुणी महा भागाने माचीस भेटल नसेल म्हणुन देव्हार्यातील दिव्याच्या वातीवर सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न केला होता कारण मी येईपर्यंत सिगारेटच अर्धवट जळालेलं थोटुक तसेच बाजुला पडुन होतं." (त्याचक्षणी हे करणाऱया पप्याचा बावळट चेहरा आठवला आणि नेहमीच तो अशी काहीतरी च्यु..गीरी करतो ज्याच्यामुळे सार्या प्लानचे तीन तेरा वाजतात ह्या इतर मित्रांच्या वाक्याला मीही संमती दिली) त्यातही जेव्हा सर्व बाटल्या विकायला मी भंगारवाल्याला बोलावले, तर तोंड वरुन म्हणतो कसा "भाभीजी साब वाईन शॉप मे काम करते है क्या? अगर है तो ये रहा मेरा कार्ड हर महिना मै घर पर आके ही बॉटल खरीद लुंगा." कसाबसा ओरडुन त्याला फुटवला. अजुन पाच सहा दिवस नसते तर लोकांनीही उकीरडा समजुन कचऱ्याच्या पिशव्या आपल्याच घरात टाकल्या असत्या." आपली चुक असल्यामुळे मी मात्र मुग गिळुन गप्प होतो. मला असं गप्प झालेलं पाहुन हीच म्हणाली, "जाऊ द्या हो. असं मनाला लाऊन घेऊ नका मी केव्हाच हे विसरलेय. (मनात आलं मग आत्ताच तीन महिन्यांपुर्वीचा प्रसंग कसा आठवला?) हा तर मी काय म्हणते लग्नासाठी मी काल दादरला एक पैठणी पाहीली आहे. फक्त पंचवीस हजार रुपयांचीच आहे तशी मी घेणारच नव्हते. पण माझ्या सगळ्या बाल मैत्रीनी लग्नाला येणार आहेत. (ह्या शब्दावर आमच्या लग्नात आलेल्या सर्व भोचक भवान्यांचे चेहरे आणि त्यांनी जीजु.. जीजु.. जीजु म्हनुन जो काही उच्छाद मांडला होता तो आठवला आणि नकळत छातीत धडधड वाढु लागली.) आणि मला वाटतं गेल्या तीन एक वर्षात आम्ही एक-मेकींना भेटलो सुद्धा नाहीये, म्हटल भेटल्यावर जरा स्पेशल दिसल पाहीजे. शेवटी मनोहर पाटलांच्या इभ्रतीचा प्रश्न आहे?" "कोण मनोहर पाटील?" मी केविलवाण्या स्वरात विचारलं. "ए मन्या, असा रे काय करतोस? माझं ठीक आहे पण स्वतःचे नावदेखील विसरलास?" सौ. तारस्वरात केकटल्या. "नाही गं, माझ असं पुर्ण नावं ऐकण्याचा प्रसंग तो हि तुझ्या तोंडुन बहुदा क्वचीतच येतो. त्यामुळे जरा संभ्रमात पडलो." "पुरे आता स्वतःच सांत्वन. मी काय रागात तुला मन्या बोलत नाही. ते सोड, तु उद्या कामावरुन लवकर घरी ये, आपण खरेदी करायला जातोय." असं बोलुन (म्हणजेच खडसावून) ती आत गेली.

आता माझ्या पोटात पस्तीस-चाळीस हजारांचा गोळा आला होता, कारण साडी आली म्हणजे तिला "मॅचिंग" बाकीच "पॅचिंग" ही आलच. हातातला चहादेखील माझ्यासारखाच थंड झाला होता..................


- श्रीमत् ( महेन्द्र लक्ष्मण कदम)


(हा विनोदी लेख लिहण्यामागे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याची माझी इच्छा नाहीये तसेच त्यातील प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत.)

Monday, November 23, 2009

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आला असेल आणि माझ्या मते तो सर्वश्रुत असेल तो म्हणजे - 'आता तयारी करुन आपल्याला कामाला जायचं आहे.' आयला लहानपणी शाळेत जायची तयारी आणि आता कामाची. तेव्हा शाळेत जाईपर्यंत आई किंवा बाबांची कटकट (अर्थात आपल्याच भल्यासाठी) आणि आता बायकोची (वायफळ किंवा फाल्तु बकवास फक्त लग्न झालेल्यांसाठी). त्या बाबतीत अजुन पर्यंत मी तरी सुखी आहे ह्या विचाराने मी सुखावतोय ना सुखावतोय; की बॉसचा रागीट आणि खडुस चेहरा माझ्या समोर आला व क्षणापुर्वीच झालेला आनंद मावळला. खरच सुख कीती क्षणीक असते ह्याची प्रचीती आली. तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "अरे मन्या, कामाला जायचय ना? ८.०० वाजलेत." ह्या एका ओळीने माझी सारी शरीर यंत्रना कामाला लागली. मी पटापट बिछाना गुंडाळला आणी तडक बाथरुम मध्ये घुसलो. आता तिथे काय केलय हे वेगळे सांगायला नको, पण आंघोळ अहो आं-------घोळ तिथेही घोळ आलाच. नावाला दोनच तांबे डोक्यावरुन त्यामुळेच ह्या Deo वाल्या कंपण्यांच जरा जास्तच फावतय. आणि हो आंघोळीशी संबधीत एखादी स्पर्धा असेल तर भारताला मी नक्कीच पहीलं गोल्ड मिळवुन देईन (कृपया कोणाला माहीती असेल तर नक्की कळवा).

सुचिर्भुत होऊन बाहेर आल्यानंतर मी घाई-घाईत प्रा:तस्मरण केले. तेवढ्यात बाजुलाच पुजा करत असलेले आमचे तीर्थरुप म्हणाले, "अरे ते तरी कशाला करतोस? देवावर उपकार केल्यासारख, "मनी नाही भाव आणि देवा मला पाव"". तेव्हा मी चिडक्या स्वरातच बोललो, "अण्णा देव भावाचा भुकेला, समजल? त्यात मला लेट झालय." "मन्या, तुझ हे रोजचच आहे. रात्री बारा एक शिवाय झोपायच नाही आणि मग सकाळी ही धावपळ. मग कधी मोबाईल विसरायचा, कधी घड्याळ तरी अगदीच कळस म्हणजे पाकिट ट्रेन पाससहीत घरी ठेऊन जायचं आणि बसायच चीडचीड करत!". माझ्या एका लूज बॉलवरती आण्णांनी पार होम रनच मारला. मी स्वतःच्याच कानफडात मारल्यासारखा किचनमध्ये पळालो, नेहमीप्रमाने आईने ब्रेडच्या स्लाईस किचन मध्ये ठेवल्या होत्याच. त्या बाजुच्या पेल्यातल्या चहात बुडवुन अधाश्यासारख्या खाल्ल्या. टिफिन बॅगेत भरला तसेच घाई-घाईत मोजे चढवले आणि आईला आवाज दिला "आईईई...... येतो गं"

आई: अरे न्याहारी केलीस का?

मी: हो किचन वर ठेवलेले ब्रेड आणि चहा घेतला.

आई: चहा? कोणता? मी तर दुध ठेवल होतं ग्लासमध्ये झाकुन.

मी : अगं सोडंना, पेल्यात होता चहा, छान झाला होता.

आई : अरे गाढवां, तो ह्यांनी चहा पिऊन हात धुवुन ठेवलेला पेला होता. अरे मन्या न्याहारी तरी व्यवस्थीत करत जा बघ किती सुकलायस तो.

आणि सहज माझी नजर माझ्या ३६ च्या वाढलेल्या कंबरेकडे गेली आणि सर्व आयांना त्यांची मुल जन्मभर लहानच असतात ह्याची खात्री पटली.

"चल आई येतो आता" म्हणत मी अश्वावर आरुढ झाल्यासारखा घराबाहेर पडलो. आता माझ्या डोळ्यासमोर एकच ध्येय दिसत होते ते म्हणजे ८.३२ ची अंधेरी लोकल. दचकलात ना? होय मी अंधेरी ला कामाला आहे. माझ्या लहाणपणी मी शहनशहातल "अंधेरी रातो मे..." हे गाणं ऐकायचो आणि ह्या अंधेरीला त्या गाण्याशी रिलेट करायचो. म्हणजे थोडक्यात अंधेरीविषयी मला पहिल्यापासुनच भिती आणि तिथे कामाला असलेल्या माझ्याच काही मित्रांनी “तिथे कशी गर्दी असते हे गर्दीसारखच फुलवून सांगितल्यामुळे” मी जाम घाबरलो होतो. होतो म्हणजे घटनेला आता तीन वर्ष उलटुन गेलीयेत आणि मी पक्का अंधेरीकर झालोय. नुकतच एका प्रसिद्ध व्रुत्तपत्राने (दै.पुण्य नगरी) आपल्या एका अहवालात म्हटलय की, अंधेरीला सबंध दिवसात येणार्‍या जाणार्‍या लोकांना साखळीत उभ केल तर काश्मीर ते कन्याकुमारी मानवी ब्रीज तयार होईल. च्यायला हे काय पट्टी घेऊन मोजायला जातात की काय? उगच आपल काही तरी.

तसं माझ घर आणि स्टेशन हे अंतर ५ ते १० मि. परंतू मी निघणार ८.२५ ला मग…… मग सगळ तुमच्या लक्षात आलं असेलच! एखाद्या योध्याच्या अविर्र्भावात मी चालायला लागलो. पाचंच मिनिटात स्टेशन 'चालत' गाठायचे. म्हणजे मी चालतच असतो, पण लोकांना उगीचच मी पळत असल्याचा भास होतो. सबंध दिवसात जो काही घाम येत असेल त्यापैकीचा ५० टक्के कोटा बहुधा ह्या पाच मिनिटांतच पुर्ण होत असावा. तेवढ्यात क्षणापुर्वीच मारलेल्या Deo चा वास अनंतात विलीन झालाय याची जाणीव होते. आता विचार करा मी कसा दिसत असेन? ओले कपडे (घामाचे) भेदरलेला निर्विकार चेहरा आणि विस्कटलेल केस तरी मी म्हणतो आई नेहमी माझी द्रुष्ट काढायची आहे असं का म्हणते? कित्येकदा काही “खवचट” लोकांनी मुद्दाम मला विचारलेही काय मन्या कामावरुन येतोयस की जातोयस? तर हे झालं स्टेशन पर्यंतच.

कशी बशी गाडी मिळवली व नेहमीप्रमाणे छान वास(Deo चा) येणार्‍या माणसाच्याच बाजुला जाऊन उभा राहीलो. त्याचे असे की एक सत्य मला चांगल उमगलयं. मानसाने कितीही वेगवेगळे Deo किंवा सेंट बनवले तरीही गर्दीत सर्वांचा वास(??) sorry सुगंध सारखाच येतो. डब्यात नेहमीप्रमाणे काही ओळखीच्या लोकांना हात दाखवुन वैगेरे झाल्यानंतर मी स्थिर-स्थावर होऊ लागलो. एक सबंध नजर डब्यातुन फिरवली त्यात एक गोष्ट माझ्या लक्ष्यात आली ती म्हणजे प्रत्येकाच्या पाठीवरचे "ओझे" म्हणजे बॅग हो! हे लोक ऑफीसला चाललेत की ट्रेकींगला कळता मुश्किल ह्या मिश्किल विचारातच स्वतःशीच हसत मी माझीही बॅग पुढे घेतली व हळुच त्यातुन हेड फोन काढला आणि कानाला लावला. अर्थात दुसरे टोक मोबाईललाच लावणार? काय "तुम्हीपण" हा आता असे करण्यामागे गाणी ऍकण्यापेक्षा मोबाईल चोरीला जाऊ नये हाच उदात्त हेतु. (त्याच असं की हल्ली नव-नवीन महागड्या मोबाईल्स मुळे चोरांच फार फावलय साले पा़कीटाला हात लावणार नाहीत पण खिशातला मोबाईल कधी उडवतील ह्याचा बेत नाही) गाणं वाजायचं बंद झाल की समजायच मोबाईलच काहीतरी बंर वाईट झाल म्हणुन. आहे की नाही झक्क्कास idea (an idea can save ur mobile अशी नवी स्लोगन आली तर नवल वाटुन घेऊ नका.)

हया विचारांच्या गर्तेत असतानाच माझी नजर सहजच माझ्या पायांकडे गेली, तेव्हा उजवा पाय सफेद तर डावा गडद निळा दिसत होता. मगाशी घाईघाईत आपण दोन वेग-वेगळे मोजे चढवलेत ह्याचा साक्षात्कार झाला. मुर्खपणा झाला इथपर्यंत ठिक होते पण ह्यापैकी एक मोजा आमच्या तीर्थरुपांचा असल्यामुळे घरी त्यांनी आईला बेजार केलं असणार आणि शेवटी फिरुन त्यांना कळणारच खरा गुन्हेगार कोन तो? आण्णांचा त्रस्त चेहरा समोर आला आणि काळजी करावी की घाबरावं ह्या द्विधा मनस्थीतीत मी सापडलो. एवढ्यातच बाजुला मोठ्याने हसण्या खिदळण्याचा आवाज आला व माझे लक्ष तिकडे गेले. चार-पाच गुज्जु बांधव छान रम्मी (जुगार) खेळण्यात रमले होते. तसं हे त्यांच नेहमीचचं आणि बहुतेक उपजीवीकेच साधन असावे? कारण गेली तिन वर्षे मी त्यांना त्याच ठिकाणी तेच करताना बघतोय. फार फार तर काय बदल होत असेल तर ज्याला खेळता येत नसेल तोही बाजुला बसुन आपोआपच शिकतो व त्यांच्या कंपुत जॉईन होतो एवढच.

थोड्याच वेळात "अगला स्टेशन अंधेरी, पुढील स्टेशन अंधेरी, next station Andheri" असे तीन वेगवेगळ्या भाषेत घाबरवल्यानंतर तो मंजुळ आवाज बंद झाला. आणि मी भानावर आलो एक-एक करुन सर्वजन आपल्या जागेवरुन ऊठू लागले, तर दरवाज्यातील काही मंडळी मागे सरुन उभी राहु लागली. कारण काय तर ट्रेन फक्त अंधेरी पर्यंतच असल्यामुळे खाली चर्चगेटला जाणार्‍या "भावीकांची" तुडुंब गर्दी असते. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली रे लागली की कळ्पातल्या गुरांसारखी सर्व गर्दी चार बाय सात च्या त्या दरवाजातुन आत शिरायला बघते. मी कित्येकदा ह्या विलोभनीय द्रुष्याचा आस्वाद घेतलाय. एखादा मजबुत अंग काठीचा(ची) असेल तर निभावुन जातात, पण शरीर यष्टी बारीक असेल तर तुम्ही परत चर्चगेटपर्यंत गेलात म्हणुन समजा. खरंच बडा है तो बेहतर है! (अंगकाठी हो) आणि आरडा-ओरडा वेगळा सांगयला नको. कित्येकजण प्रवासासाठी आलेत की मोर्चा घेऊन हे "ते" ट्रेनमध्ये बसल्याशिवाय कळतच नाही. तिथुन कसाबसा मुसंडी मारुन ट्रेन च्या बाहेर पडलो आणि नकळत तोंडातुन "वाचलोय वाचलोय हुश्शःssssss" असे भावुक शब्द आले. पुन्हा एकदा अंगावरील सर्व आभुषने नीट तपासली आणि स्टेयर्सचा दिशेने चालु लागलो. अंधेरीत येऊन एक गोष्ट मात्र मी अनुभवातुन शिकलोय, गर्दीत जास्त हात पाय न हालवता स्वताला लोकांच्या स्वाधीन(त्या अर्थाने नाही) करायचे, म्हणजे काय कडेवर उचलायला सांगायचे नाही. तर शांत चेहरा ठेऊन अलगद चालत राहायचे तुम्ही कधी बाहेर पडलात (स्टेशनच्या हो) ते कळनारच नाही आहे.

स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर पहीली पाच मिनीटे कळतच नाही की आपण नक्की मुख्य रस्त्याकडे चाललोय की एखद्द्या मार्केटमध्ये घुसलोय. अगदी नेल पॉलीशपासुन ते फणी पर्यंत सर्व “items” म्हणजे वस्तु…… नाही कळलं? जरा विस्कटुन सांगतो, पायाच्या नखापासुन डोक्याच्या केसापर्यंत जे जे लागत ते सर्व तुम्हाला आजुबाजुलाच मिळेल. हा पण पैसे मोजावे लागतील नाहीतर राहाल माझ्यासारखे गोड संभ्रमात. एकदा काय झाल मी स्टेशन मधुन बाहेर पडल्या पडल्या एका ज्युस वाल्याने मला हातवारे करुन बोलावलं मला वाटले, असेल काहीतरी सणानिमीत्त्त नाहीतरी आपल्याकडे गणेशोत्सवात मिरवणुकीतील लोकांना काहीतरी फुकट देण्याची प्रथा आहेच. त्यामुळे तसंच काहीस वाटुन मी पुढे सरसावलो त्यात उन्हाळा असल्यामुळे तहानलो होतोच. गेलो आणि छान दोन ग्लास सरबत रिचवला पिता पिता त्याला छान आशिर्वादही दिले ग्लास ठेवला आणि चालु लागलो. ईतक्यात मागुन (पाठीच्या हा) मोठ्या ने आवाज आला "साब"(ह silent) ओ "साब" मीही त्याच्याकडे पाहीले आणि म्हटले, "बसं यार दो ग्लास मे ही पेट भर गया अब और नही." "हा ना? तो फिर मेरे पेट पे लात क्यु मार रहे हो? मेरा पैसा तो दो", तो अत्यंत कळवळीने बोलला. "कैसा पैसा?" मी यमक जुळवत बोललो. "शरबत का", "अबे तुने ही तो मुझे हात दिखाके बुलाया." मी त्वेषात बोललो. "साब, वो तो मेरा धंदा है. लगता है आप नये हो यहा पे." "चल बस कर. कितना हुआ?" म्हणत मी प्रकरण संपवल आणि मनोमन बडबडत अर्थात आशिर्वादाची जागा आता शिव्यांनी घेतली होती तिथुन निघालो. अजुनही असं काही आठवल की मी माझ्याच बावळटपणावर येथेच्छ हसतो.

स्टेशन समोरच आगरकर चौकात एक सुलभ शौचालय आहे. मला आजही आठवतय माझ्या सुरवातीच्या काळात मी जेव्हा अंधेरीत जॉईन केल होतं तेव्हा समोरील लाईन पाहुन खरचं फार घाबरलो होतो. पहील्यांदा वाटल की आज काय जागतिक स्कॉटींग (संडा--) दिवस आहे की काय? पण लगेचच एका सभ्य (फक्त वाटत होता) ग्रुह्स्थाने ती SEEPZ ला जाणार्‍या बसेस ची रांग आहे हे सांगीतले व माझ्या भीतीत अजुनच भर घातली होती. त्या प्रसंगानंतर जर काही बदल झाला असेल तर ती गर्दी आता त्या सुलभच्याही पुढे गेली आहे. कधी-कधी वाटत एखादी बस पाऊन एक तास लेट झाली तर रांगेतला शेवटचा माणुस थेटं SEEPZ लाच पोहचायचा. मी मात्र ह्या फंदात नं पडता सरळ चालत जाणंच पसंद करतो त्यामुळे फायदा काय? तर “पायांचाही” व्यायाम होतो आणि “डोळ्यांचाही“

दरम्यानच्या काळात अंधेरीने बरचं सोसलयं. ठिकठिकाणी मोठे मोठे कॉंम्प्लेक्स झालेत. अत्यंत परिचीत आणि जुन्या कलाकारांची खरी ओळख असलेला नटराज स्टुडीओ जाऊन तेथे नटराज टॉवर उभा राहतोय. अनिल ने (अंबानी हो) METRO चे tender भरलय की "उत्खणनाचे"(excavation) तेच कळ्त नाही आणि पोल्युशन तर विचारु नका. आख्या प्रुथ्वीवर ओझोनला जर सगळ्यात मोठं भोक कुठे पडेल तर ते अंधेरीत असेल? (सौजन्य दै. बोंबाबोंब) आणि सगळ्यात गहन प्रश्न जो तुमच्या आमच्या सारख्या Common Man ला नक्कीच पडतो तो म्हणजे अंधेरीत ह्या गर्दीशी लढण्यास खरच आपली प्रशासन व्यवस्था तेवढी तत्पर आहे का? गावा-गावात Sky walk असताना अंधेरीचा ह्याबाबतीत साधा विचारही होऊ नये? नको त्या ठिकानी Sub Way बांधुन "पाणी साठवण्यापेक्षा" Western Express Highway वर काही महत्वाच्या ठिकाणी बांधले तर लोकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्तातरी ओलांडावा लाङणार नाही. जाऊद्या लिहावं तेवढ कमीचं मी उगाचच ईमोशनल झालो.

ह्या सार्‍या विचारांच्या बट्या बोळात ऑफिस कधी आलं ते कळल सुद्दा नाही. ईथपर्यंत सुखरुप आणल्याबद्दल मी देवाचे आभार मानले आणि पळतच ताटकळत उभ्या असलेल्या “lift” मध्ये प्रवेश केला कारण नेहमीप्रमाणेच आजही उशीर झाला होता.



- श्रीमत्(महेन्द्र लक्ष्मण कदम)